Friday, January 1, 2016

त्यांच्या हत्या आणि आत्महत्येलाही शुभेच्छा

        रात्रीचे साडेबार वाजलेत, नव वर्षाचं स्वागत जोरदार चालू आहे. नववर्ष स्वागताचा उत्सव चालू आहे. मागील 3 दिवसापासून लातूरमध्ये आहे. 20 दिवसापासून नळाला पाणी नाही. अर्ध्या तासापूर्वी एकीकडे नववर्षाचे स्वागत तर दुसरीकडे सोसायटीमधील पाण्याच्या टाकीवरून पाणी नेणाऱ्या बाया दिसत होत्या. त्यांच्य़ासाठी कुठलं आलंय होय हो नवं वर्ष. ज्या दिवशी पाणी सुटेल आणि लांबून कुठून तरी पाणी आणायचा त्रास ज्यादिवशी नसेल तेच काय त्यांच्यासाठी सेलिब्रेशन...

        उत्सव, सेलिब्रेशन आपल्याला समाज वास्तवापासून दूर नेत कुठं तरी अभासी जगात वावरायला भाग पाडतात. मागील वर्षी म्हणजेच 2015 मध्ये मराठवाड्यात प्रत्येक आठवड्यात सरासरी 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या (संदर्भ – कॅचन्यूज.कॉम). त्याच मराठवाड्यातील लातूरमध्ये रात्री 12 च्या सुमारास या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, आता हे नव्या वर्षाचे सेलिब्रेशन होते की, आमच्या आजूबाजूला राहण्याची तुमची लायकी नाही. बरंय तुम्ही आत्महत्याच करा. आमच्या विकासाच्या मॉडेलवर तुम्ही डाग आहात, त्यामुळं मागील एक वर्षात तुम्ही स्वत:हून आत्महत्या करून आमच्या विकासाच्या चेहऱ्यावरचे डाग कमी केलेत त्याचं हे सेलिब्रेशन असावं असाच संदेश माझ्यासारख्या पर्यंत पोहचला आहे.

        काल वर्षाचा शेवटचा दिवस, मागील वर्षाचा आढावा आमच्या वृत्तवाहिन्यांनी चटपटचीने घेतला. बाहुबलीचा गल्ला किती झाला ? बजरंगी भाईजानचा गल्ला किती झाला ? मोदींच्या परदेश वाऱ्यांनी काय मिळालं ?  असं मस्त तळलेलं पॅकेज दिवसभर रन केलं जात होतं.

       माझ्याही मनातील मागील वर्षातील काही हत्या आणि आत्महत्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. मागे झालेल्या किंवा तुम्ही आम्ही सर्वांनी केलेल्या हत्यांचे काल सेलिब्रेशन झाले आणि पुढे आम्ही सामूहिकरित्या, धर्मनिरपेक्ष पद्धतीने करणार असलेल्या हत्यांनाही आपण शुभेच्छा देऊयात.

        नोव्हेंबरची 8 तारीख असेल, नंदूरबारमधील मोलगी गावापासून 10 -15 किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेल गावी मुक्कामी होतो. लाईटची व्यवस्था नसलेलं गाव, संपर्काची साधने नव्हती. आजारी पडल्यास मोलगीच्या दवाखान्याशिवाय दुसरी व्यवस्था नाही. बाज्याभाऊची मुलाखत घ्यायला दहेलला गेलो होतो. रस्त्यापासून बाज्याभाऊचं घर 3 4 किलोमीटर आत पाड्यावर, रात्री उशीर झाल्यामुळे पाड्यावर न जाता गावातल्याच एका घरी मुक्काम केला. तिथं गेल्यावर कळलं की, बाज्याभाऊच्या घरी मयत झाली आहे. त्यांची भावजयी वारली आहे आणि नुकताच अंत्यविधी झालाय पण बाज्याभाऊ दुसऱ्या दिवशी तुम्हाला नक्की भेटेल. सकाळ पासून बाज्य़ाभाऊची वाट पाहत होतो. संपर्काची साधने नसल्यामुळे भेटायच्या ठरलेल्या ठिकाणी आम्ही उभे होते. पण बाज्याभाऊचा काही पत्ता नाही. मग थेट पाड्यावरच्या त्यांच्या घरी गेलो. घरी मयत झाल्याने वातावरण कसे होते ते वेगळं सांगण्याची गरज नाही. बाज्याभाऊच्या बोलण्यातून जे काही आलं ते सुन्न करणारं होतं.

        त्यांच्या भावजयीचं ऑपरेशन झालं होतं, पण त्यानंतर पेशंटला लावण्यासाठी असलेल्या ऑक्सिजनची फक्त एकच छोटी टाकी मोलगीच्या आरोग्य केंद्रात उपलब्ध होती. अर्थात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आमच्या विकासाच्या चकाट्या पेटणाऱ्या भारतातील आदिवासीचा मृत्यू झाला असेल हे पटणारही नाही. त्यांच्यासाठी कुठं आलंय हो नव्या वर्षाचे सेलिब्रेशन. तो फक्त मृत्यू नव्हता तर माझ्या तुमच्या सुखासीन आयुष्यासाठी जी धोरणं रावबिण्याचा घाट इथल्या व्यवस्थेने घातला आहे, त्या सर्वांनी केलेला हा कोल्ड ब्लडेड मर्डर होता. कदाचित काल रात्री पार पडलेलं सेलिब्रेशन त्यासाठीही होतं.

        सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाऊन आम्ही देशाला डिजीटल करायला निघालो आहेत. डिजीटल स्वरूपातील आचार, विचार, मरण सगळं स्वस्त झालंय ना, फक्त जगणं तेवढं महागलंय. 2015मध्ये लॅन्सेट जर्नलच्या अंकात भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या निधीमध्ये 50 टक्क्याहून जास्त कपात करण्यात आल्याचा अहवाल छापण्यात आला होता. कापलेला 50 टक्के निधी कुठे वळविण्यात आला याबाबत मात्र काही माहिती देण्यात आली नव्हती. काल सकाळी टि. व्ही. लावला. एनडीटीव्हीवर बातमी चालू होती, महाराष्ट्रातील आरोग्य सेवा महागणार... एवढी मोठी बातमी जी तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या, राज्य़ातील 70 ते 80 टक्के लोकांच्या जीवनावर परिणाम टाकणारी होती. पण सेलिब्रेशनच्या त्या रंगारंग थर्टी फस्टमध्ये महाराष्ट्रातील प्रादेशिक माध्यमांना त्याची जराशीही दखल घ्यावी वाटली नाही. आज सकाळी पेपर पाहिले तर कोणत्याच वर्तमानपत्रात त्याची बातमी नाही. म्हणजेच न छापता आम्ही पुढच्या वर्षी होणाऱ्या हत्यांनाही शुभेच्छाच दिल्या.

        व्हॉट्सअपवर शुभेच्छाचे मेसेज येत होते. तसे मला अन्वीक्षण मासिकाच्या अंकातून दत्ता थोरेंच्या लेखातून भेटलेला कांबळे आठवला. बाबासाहेंबांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या विचारातून गटार साफ करण्याचे काम सोडणाऱ्या कांबळेंना दुष्काळाने परत एकदा हात गटारातच घालायला लावले. कॉलेजला जाताना प्रवासासाठी लागणाऱ्या बसच्या पासचे पैसे नसल्याने आत्महत्या करणाऱ्या त्या मुलीच्या घरी कसे असेल आजचे सेलिब्रेशन... त्या आत्महत्या केलेल्या 5000 शेतकऱ्यांच्या घरी कसे असेल नववर्षाचे सेलिब्रेशन ? रात्री 12 वाजता लुनावर 10 10 घागरी पाणी नेणाऱ्या माणसाच्या घरी केस असेल सेलिब्रेशन.

        रात्रीच्या रंगारंग कार्यक्रमात, चर्चांमध्ये, पॅनेल डिस्कशनमध्ये का नाही उमटले शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या आत्महत्यांचे, हत्यांचे प्रतिबिंब... का नाही झाली चर्चा पुढच्या वर्षात त्यांना कसे जगविता याची... का घेतला गेला नाही आमच्या समोरच्या समस्यांचा वेध कारण आम्ही सेलिब्रेशनची भूल घेतली होती. त्याच भूलीत आम्ही चर्चा केली नाही वास्तवाची म्हणजेच येऊ घातलेल्या वर्षाला नाही तर होऊ घातलेल्या आत्महत्यांनाच आम्ही शुभेच्छा देत आहोत. सकाळीच बातमी वाचली, मुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दुष्काळ दौऱ्यावेळी लातूर जिल्ह्यात कशाबशा चार चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवल्या फिरवल्या त्यातील दोन बंद केल्या होत्या, तर उरलेल्या दोन काल बंद झाल्या. नवीन वर्ष सुरू झालं, पावसाळ्याला अजून 6 महिने बाकी आहेत, त्यात कडक उन्हाळा आडवा असेल. धरणातील पाण्याने गाळ गाठला आहे. लातूरासारख्या शहराला फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा बंद असणार आहे. मग बाकीच्या उस्मानाबाद, बीड, हिंगोलीची तर गोष्ट लांबचीच आणि गावांचीही लांबचीच. मराठवाड्याचा नैसर्गिक दुष्काळ कधीचाच मागं पडलाय, आता आहे तो राजकीय आणि धोरणांचा दुष्काळ...बरं आता हा शोध कोण लावला याच्याशी आपल्याला काय देणं घेणं ? आपलं कसं मस्त चाललंल ना मग चालू द्या सेलिब्रेशन... जनतेच्या राजानेही कधी काळी दुष्काळ भागाचा दौरा केला, राजकारण केलं आणि दुष्काळ तीव्र झाल्यावर मात्र वाढदिवसाचं सेलिब्रेशनही केलं, आता त्यांना कोण प्रश्न विचारणार ना ? राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना मोदींपासून येचूरीपर्यंत सर्वजण त्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेत. म्हणून तर आमच्याकडं उत्सवं असतात, प्रश्नांची दाहकता हळूवारपणे कमी करण्याचे सर्वाधिक प्रभावी माध्यम म्हणजे उत्सव...  

         आज काल असं काही लिहायचं म्हटलं की दडपण येतं, गरवारे महाविद्यालयात एम. एस्सी करत असताना एक प्राध्यापक होते, तसे फॉरेन रिटर्न... विदर्भात कडक दुष्काळ पडला होता, आसारामांचा रंगपंचमी निमित्त नागपूरला कार्यक्रम झाला. लाखो लिटर पाणी उडविण्यात आले. त्यावर बोलत असताना, आमच्या त्या प्राध्यापकांनी प्रतिक्रिया दिली, की तिकडं पाणी नाही किंवा दुष्काळ आहे म्हणून आम्ही का आमचे उत्सव साजरे करायचे नाहीत. ही प्रतिक्रिया इतकी भावना आणि विचार शून्य होती की त्यानंतर दुष्काळ आणि उत्सव यावर काही लिहायचं म्हटलं तर उत्सवासाठी पिलेली अफू जोपर्यंत परिघातील लोकांमधून निघून जात नाही तो पर्यंत लिहिलेलं ब्लॉगवर टाकायंच नाही असं ठरवलं होतं. म्हणून रात्री न टाकता हा ब्लॉग आता टाकत आहे. नाहीतर सकाळ सकाळी मलाच काय भोसल्या तू लई बोर आहेस राव, तुम्हांला दुसरं काही सूचत नाही बाबा सारखे मेसेज वाचायला मिळाले असते. 

        आम्हांला काही सुचे की नाही सुचो बाबा पण बळीचं राज्य येण्यासाठीच्या कल्पना तुमच्या डोक्यात येवो नाहीतर तुमच्या या शुभेच्छा नववर्षाला होत्या की, आत्महत्यांनां हे 31 डिसेंबर 2016 ची रात्रच सांगेल.  डोक्याला झिणझिण्या आल्या असतील तर चल सोड रे म्हणून रात्रीची उरलेली घ्या थोडी सगळं विसरून जाल....

लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

http://movementswatch.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/

1 comment:

  1. काय बोलणार आता.....मस्त अभिषेक

    ReplyDelete