Saturday, September 3, 2016

भीम पुतळ्यातून बाहेर येतोय...

वैचारिक चर्चा आणि तरुणाई याचा काही संबंध राहिलाच नाही, अशी ओरड होत असताना एका बाजूला याच तरुण पिढीला आंबेडकरांनी १९३६मध्ये लिहिलेलं जाती निर्मूलनाचं भाषण केंद्रस्थानी ठेवून त्यावर चर्चा घडवून आणण्याची आवश्यकता का वाटतेय? आजच्या जातकेंद्री वातावरणात या तरुणाईला आंबेडकरच का जवळचे वाटत आहेत? डॉ. आंबेडकर लिखित ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथाला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने घेतलेला हा सम्यक वेध...
..........................................

१. स्थळ :  पुण्यातील भांडारकर रोडवरील कमला नेहरू पार्क... उच्च मध्यमवर्गीय-उच्चभ्रू लोकांचे हे विरंगुळ्याचे ठिकाण... एकीकडे संपूर्ण भारतभर आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. केंद्रातील, राज्यातील सत्ताधारी, राजकारणी, त्यांच्या मातृसंस्था आंबेडकरांना डोक्यावर घेत होत्या. वस्त्यांमधून जयंती मिरवणुकांना सुरुवात होणार होती. त्याच वेळी या कमला नेहरू पार्कमध्ये कुटुंबासह येणाऱ्यांच्या कानांवर पार्कच्या मध्यभागी बसलेल्या एका ग्रुपच्या चर्चेतून जात, हिंदू धर्म, जाती निर्मूलन हे शब्द कानावर पडत होते. पुण्यातील काही समविचारी मित्रांनी/तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘कारवाँ’ गटातर्फे रोहित वेमुलाची आत्महत्या, पुण्यातील एफटीआयआयचं प्रकरण आणि एकूणच देशातील सामाजिक-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर लिखित ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’चं अभिवाचन सुरू होतं. काही जण त्याकडे गांर्भीयाने पाहात होते, ऐकत होते, बघणाऱ्यांतले दोन-तीन जण त्या गटात सहभागीही झाले; बाकी मात्र त्यांच्याकडे पाहून नाकं मुरडत, तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकत आपलं मनोरंजन करून घेत होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने १४ मे रोजी परत याच ठिकाणी याच तरुणांनी ‘कास्ट इन इंडिया’ या ग्रंथाचं अभिवाचनही केलं होतं...
२. सुदर्शन रंगमंच... एका विशिष्ट समाजवर्गाचे प्रेक्षक असलेलं हे ठिकाण. रंगमंचावर पांढरा कुर्ता घालून एका विशिष्ट रचनेत बसलेले सहा तरुण कलाकार. त्यांच्या संवादामध्ये कोणत्याही प्रकारचा नाटकी आवेश नव्हता. अतिशय शांत, संयमीपणानं ते काहीतरी वाचत होते. त्यांच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडत होते, ते कोण्या नाटककारानं लिहिलेले नव्हते, तर ते डॉ. आंबेडकरांच्या ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’मधील होते.

वेगवेगळ्या गटांकडून छोट्या प्रमाणात विविधांगी विषयांना हात घालणाऱ्या, भाष्य करणाऱ्या या रंगमंचावरून कधी नव्हे ती थेट आंबेडकरांना बोलण्यास, व्यक्त होण्यास जागा मिळाली होती. पुस्तकातील शब्द जसे कानावर पडत होते, तशी स्क्रिनवर दाखवली जाणारी उनामधल्या मारहाणीची दृश्ये त्या वाक्यांचे वर्तमान संदर्भ देत होती आणि प्रयोगाच्या शेवटी दाखवलेलं रोहितचं पत्र आंबेडकरांच्या या पुस्तकाची वर्तमान गरज प्रेक्षकांच्या मनात पेरत होतं...
---------------------------------
वैचारिक चर्चा आणि तरुणाई याचा काही संबंध राहिलेलाच नाही, अशी ओरड होत असताना आजच्या पिढीला पुन्हा एकदा आंबेडकरांचं मूळ लिखाण वाचण्याची का गरज वाटत आहे? मुळात, १९३६मध्ये  डॉ. आंबेडकरांनी लिहिलेलं जाती निर्मूलनाचं भाषण केंद्रस्थानी ठेवून त्यावर चर्चा घडवून आणण्याची आवश्यकता का वाटतेय, आमच्या पिढीला? 
एम. ए. करताना बाकी पर्याय नको, म्हणून अभ्यासाला निवडलेला आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा पेपर आणि त्यातून अनुज देशपांडेला समजत गेलेले आंबेडकर, घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी आंबेडकर ज्याला सहमार्गी वाटतात असा सिद्धार्थ महाशब्दे, आंबेडकरी जलसाकाराच्या कौटुंबिक परंपरेतून आलेला राहुल गायकवाड, स्त्रीवादाचा अभ्यास करताना निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी आनंदिता घोषनं पहिल्यांदा वाचलेला आंबेडकर, नष्ट होत असलेल्या ‘पब्लिक स्पेस’बद्दल बोलणारा चळवळीच्या पार्श्वभूमीतून आलेला साहिल कल्लोळी... ही फक्त प्रातिनिधिक नावं. प्रत्येकाला आंबेडकर कसे भेटले, याची कथा तर वेगळीच. पण, या सगळ्यांमधलं साम्य एक आहे, ते म्हणजे, त्यांना आंबेडकर समजून घ्यायचाय. त्यावर सार्वजनिक ठिकाणी चर्चा घडवून आणायची आहे. आंबेडकरांचे जाती निर्मूलनाचे विचार ज्यांना समजायला हवेत, त्या जातीसमुदायापर्यंत आणि समाजगटांपर्यंत ते पोहोचायचे आहेत. एरवी, ज्याला जातीचे चटके बसतात त्यालाच आपण परत परत आंबेडकर सांगतोय. जो जातीव्यवस्था जोपासण्याचं काम करतोय, त्याला मात्र हे काहीच माहीत नाही. त्यामुळे या गटांनी निवडलेली ठिकाणंसुद्धा अशाच प्रकारची आहेत, जिथे कधीच थेट जात किंवा तिचं निर्मूलन यावर चर्चा होत नाही, किंबहुना जात अस्तित्वात आहे हेच पटत नाही. 
स्त्रियांशी संबंधित काम करणारी आनंदिता, मूळची बंगालची. सामाजिक वर्तुळात काम करताना तिला जात आणि पुरुषसत्ताक व्यवस्था याचा संबंध समजून घ्यायचा असेल तर आंबेडकर वाच, असं कोणीतरी सांगितलं. आनंदिता सांगते, “मी पहिल्यांदा आंबेडकरांचं मूळ लिखाण वाचायचं म्हणून ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ वाचायला घेतलं. पण मला त्यासोबत मुळात जाऊन जोडून घेता आलं नाही. मी ते एकटीने वाचलं होतं. त्यामुळे त्यावर कोणाशी बोललेही नव्हते. पण नक्कीच ते वाचून प्रभावित झाले होते. कमला नेहरू पार्कमध्ये आम्ही केलेल्या अभिवाचनातून अनेकांचे वेगळे अनुभव, दृष्टिकोन समोर आले. त्यातून ते समजायला अधिक मदत झाली. त्यामुळे खोलात चर्चा व्हायची असेल तर अशा सार्वजनिक ठिकाणी मूळ लिखाणांची अभिवाचनं होण्याची गरज आहे.”

अनुज ज्याच्यासाठी लहानपणापासून आंबेडकर म्हणजे, कधीही काहीही संबंध नसलेला माणूस. पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचं शिक्षण घेत असताना अपघातानेच आंबेडकरांची त्याला ओळख झाली. सावरकर, गांधी वगैरे पर्याय असताना काहीतरी नवीन जाणून घेण्याच्या उद्देशानं अनुजनं आंबेडकरांचं तत्त्वज्ञान, हा पेपर निवडला. कॉलेज जीवनापासून नाटकात काम करायचा.

वडिलांची स्वत:ची लायब्ररी. तरीही आंबेडकर मात्र त्याच्यापासून कोसो दूरच होते. पण जेव्हा त्यानं आंबेडकर वाचला, त्यानंतर मात्र त्याला हे आंबेडकरांचे मूळ विचार त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे ‘पब्लिक स्पेस’मध्ये घेऊन जाण्याची गरज वाटली. त्यासाठी अनुजनं रंगभूमीची निवड केली. ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’मधील उतारे, जाती निर्मूलनाची गाणी आणि दलित चित्र/ छायाचित्र कलेचा आविष्कार असा संगम साधत त्यानं आणि त्याच्या ग्रुपने सादर केलेला रंगभूमीवरील ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’च्या अभिवाचनाचा प्रयोग नुकताच पार पडला, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रयोगाच्या शेवटी नागरिक आपल्याही भागात हा प्रयोग करण्याचं आमंत्रण अनुजला देताना दिसत होते. या सगळ्या प्रवासात अनुजला समजत गेलेली कलेतली दलित अभिव्यक्ती खूप महत्त्वाची वाटते. आजच्या निर्माण होत चाललेल्या धर्मांध वातावरणाला आंबेडकरच पर्याय आहेत, असे अनुजला वाटते. रंगभूमीवरील प्रयोगातील आणखी एक जण म्हणजे सिद्धार्थ. तसा तो जाती-धर्म यातून बाहेर पडलेला. स्वत:चा विचार आणि विवेक असलेला. या प्रयोगाच्या निमित्तानं पहिल्यांदा सिद्धार्थनं आंबेडकरांचं मूळ लिखाण वाचलं. त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं, कारण हे वाचल्यानंतर आता त्याला आपण जे वागत होतो, ते काही चूक नव्हतं, असं वाटतंय. त्याच्या जीवनाच्या पुढच्या प्रवासासाठी आंबेडकर त्याला सहप्रवासी म्हणून लाभलेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सिद्धार्थला आता घरच्यांशी किंवा नातेवाइकांशी वाद घालत बसण्यापेक्षा ते का तसं वागतात? ते का तसा विचार करतात? ते समजून घेणं, त्याचा विचार करणं महत्त्वाचं वाटतंय. काही प्रमाणात जातीचा न्यूनगंडही आता मनात निर्माण झाल्याचं तो बोलून जातो. पण दुसरीकडं नातेवाइकांसाठी मात्र सतत आजूबाजूला दिसणारी आंबेडकरांची पुस्तकं अनुज आणि सिद्धार्थ चुकीच्या मार्गाला लागलेत, याचं प्रमाणपत्र देण्यासाठी पुरेशी ठरतात, असं दोघंही आवर्जून नमूद करतात. राहुलला मात्र आंबेडकर नवीन नाहीत. त्याचेे आजोबा रामचंद्र गायकवाड हे जलसाकार. त्यामुळे लहानपणापासून तो ऐकत, वाचत आलाय, तरी या सर्व रंगभूमीच्या प्रवासामध्ये त्याचीही घुसमट होतेय. मुळातल्या लिखाणात जाऊन वाचनात आलेला आंबेडकर आणि आजूबाजूला दिसत असलेला, सांगण्यात येत असलेला आंबेडकर यात फरक असल्याचं त्याचं म्हणणं आहे. पण तो निराश नाहीये. फक्त राहुलच नाही, तर ही सर्व तरुण पिढी निराश नसून, उलट ती अधिक खोलवर जाऊन आंबेडकराचं मूळ लिखाण वाचायचा प्रयत्न करतेय.
‘कारवाँ’च्या साहिलला वाटतं की, मुद्दा फक्त आंबेडकरांना किंवा जात-धर्माच्या चर्चेला पब्लिक स्पेसमध्ये आणण्याचा नाहीये, तर नष्ट झालेली पब्लिक स्पेस परत एकदा जिवंत करण्याचा आहे. कारण जे काही वातावरण आज आमच्या आजूबाजूला आम्ही पाहतोय, ते निर्माण होण्याला नष्ट झालेली पब्लिक स्पेस हे पण एक महत्त्वाचे कारण आहे.
‘भीम पुतळ्यात बंद केला बाई’ म्हणतानाच संभाजी भगत पुढं भिमाला पुतळ्यातून बाहेर येण्याचं आवाहन करताना दिसायचे. पुतळ्यातून बाहेर पडताना वेगळा विचार, लढण्याचे वेगळे मार्ग घेऊन यायला सांगायचे. संभाजीदादा आमची पिढी भीमाला पुतळ्यातून बाहेर काढत आहेच; पण त्याचसोबत आजच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचं मूळ लिखाण चर्चासत्र आणि पाठ्यक्रमातून बाहेर काढून, त्याचं ‘पब्लिक स्पेस’मध्ये अभिवाचन करण्याचं, रंगभूमीवरून ते मांडण्याचं, त्यावर चर्चा घडवून आणण्याचं काम आमची पिढी करतेय, ही नक्कीच आश्वासक गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे, असे अभिवाचनाचे प्रयोग अधिक प्रमाणात होण्याची गरज आहे, म्हणून हा प्रपंच.
मूळ प्रकाशित लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जा
http://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-abhishek-bhosle-write-about-80-years-complete-to-dr-5404786-PHO.html



लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/

विचारा ना आम्हांला, दुष्काळग्रस्त पोरांचं नक्की होतं काय ?

तुमच्यावर आधीच गावंढळ ठप्पा मारलेला असतो. त्यात जर दुष्काळाबद्दल बोलायला तोंड उघडलं तर
शहरी पोरं म्हणणार, काय यार तुम्ही गावाकडची पोरं, लई बोअर असता राव! इकडे आपलं मन आपल्याला खातं.  ते कुणाशी बोलता येत नाही.  तिकडं गावी मायबापाची दुबार पेरणीसाठी पैशाची वणवण आणि इकडं? कुणी तोडून टाकतं, त्या जगाशी संबंधच आणि कुणीकुणी जीव जाळत,
उपाशीपोटी धरतं तग, शिक्षणाच्या आशेनं! दुष्काळग्रस्त हा शिक्का जगण्यालाच तडे पाडत जातो
........................................................
साडेचार वर्षापूर्वी शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात दाखल झालो. आपलं शहर सोडून दुस:या भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिघामध्ये आपण पोहचलो की अनेक ओळखी आपल्यामागे लागतात, त्याला मीही काही अपवाद नव्हतो.
‘विलासरावांच्या गावाचा’ ही लातूरच्या प्रत्येक माणसाला मिळणारी ओळख जोडत लोकांनी आणखी दोन ओळखी नावाच्या मागे जोडल्या. त्यातून दोन नजराही आपोआप माङयासारख्यांकडे विशिष्ट कोनातून पाहू लागतात. एक नजर आपुलकीची, तर दुसरी  ग्रामीण समस्यांच्या अंगानं ज्यांना कधी जग दिसलंच नाही अशा लोकांची ‘शहरी’ नजर!
1993 साली किल्लारीचा भूकंप झाला आणि लातूरच्या लोकांच्या मागे भूकंपग्रस्त अशी आणखी एक ओळख लागली. पुण्यात फिरताना लातूर म्हटलं की भूकंपाची आठवण करून देणारे अनेक सहानुभूती दर्शविणारे अनुभव येतात. त्यात आताशा तुम्ही विदर्भ-मराठवाडय़ातून आलात म्हणजे शहरी लोकांच्या नजरेत आणखी एक ओळख दिसते, ती म्हणजे दुष्काळग्रस्त.
 माङयासारखे अनेक जण दुष्काळग्रस्त ही ओळख घेऊन पुण्यासारख्या शहरात दाखल होतात. जिथं वाहत असतो पाण्याचा महापूर, झगमगाट असलेले रस्ते, एफ. सी रोड - जे. एम. रोडवर वन पीस आणि शॉर्ट्स घालून वावरणा:या मुली, हातात हात घालून फिरणारी जोडपी, बरिस्ता- वाडेश्वर- गुडलक- वैशाली- रूपालीतली आतली आणि बाहेरची गर्दी. दुष्काळ पाहिलेली गावाकडची पोरं मग यात स्वत:ला कुठं तरी अॅडजेस्ट करायचा प्रयत्न करत राहतात. कॉलेज सुरू झालेलं असतं, कट्टय़ावरच्या गप्पा रंगात येत असतात, व्हॉट्स अॅपवर जोक्सचं व्हायरल होणं चालू झालेलं असतं. सगळं जगच  ‘हॅपनिंग’ असतं. आणि त्याचवेळी मन तुटायला लागतं, गावाकडं पेरणी करूनही पाऊस नसल्यानं मनावर साचणारं मळभ कुणाला बाहेर सांगताही येत नाही.
एकतर आधीच तुम्ही मराठवाडा- विदर्भातून पुण्यात गेलेले, तथाकथित प्रमाण भाषेचा संबंध नसल्यामुळे एलिट वर्गाने तुम्हाला स्वीकारायची सुतराम शक्यता नसते. स्वीकारल्यानंतर त्यांच्यात बसून इंग्रजी चित्रपट, बर्गर, पिङझा यांच्या गप्पा मारायच्या सोडून दुष्काळाबद्दल बोललात तर मग विषयच संपला. तुमच्यावर आधीच गावंढळ ठप्पा मारलेला असतो त्यात आता बोअरछापही ठरवले जाता. ‘काय यार तुम्ही गावाकडची पोरं लई बोअर असता राव’ म्हणणारी एक जमात माङयासारख्या प्रत्येकाने अनुभवलेली असते.
मग इकडे आपलं मन आपल्याला खातं ते कुणाशी बोलता येत नाही. तिकडे आईवडील शेतकरी असतील तर सगळीच आर्थिक गणितं कोलमडायला लागतात. तिकडे दुबार पेरणी करायला लागली की इकडं पैशाची चणचण. मग कधी विद्यापीठात दोन दिवस काढायचे, तर कधी मित्रच्या खोलीवर दोन दिवस, मित्रच्या डब्यात दोन घास खायचे आणि निघायचं. एखादा चांगला मित्र  असला तर तो म्हणतो, ‘ठेव हे शंभर रु पये’ मग तेवढाच दिलासा.
बाकी कट्टय़ावर सगळं कसं आनंदात असतं. जगातली संकटं  संपली असून, आता फक्त उत्साहात सेल्फी काढायचाच असा नूर असतो. मग मित्रंसोबत बाहेर जाणं, फिरणं, खाणंपिणं ओघानं आणि आपल्याही नकळत अनवधानानंच सुरू होतं. पण किती दिवस? या मित्रंनी आल्यापासून आपल्यावर खर्च केलेला असतो. त्याची परतफेड पण करायची काही सोयच नसते. हातात पैसाच नसतो. मग  मित्रत  न बसणं, दिसले की लांबून जाणं अशा गोष्टी उरावर दगड ठेवून कराव्याच लागतात. म्हणजे दुष्काळ आम्हाला फक्त सतावत नाही, तर मित्रमैत्रिणी, माणसं यांच्यापासून दूर करत जातो. मग त्याचा सगळा परिणाम अभ्यासावर, वागण्या-बोलण्यावर होतोच.
अर्थात हे झालं एक चित्र. स्वत:चं मन खाणारी मुलं अशी असतात तशी या दुष्काळी नात्यापासून लांब पळणारी पोरंही असतात. उधारी करून चैन करणारीही असतातच. आपण ग्रामीण भागातून, दुष्काळातून आलोय म्हणून काय असंच राहयचं का, असा विचार करत जगणारीही असतात. गावाकडं पीक करपत चाललेलं असतं, माय दिवसभर  पाण्याच्या आणि बाप कोणासमोर तरी खतासाठी पैसे दे म्हणत हात पसरत उभा असतो आणि पोरानं मात्र इकडं आल्यावर स्मार्ट फोनसाठी, प्रयोगशाळा वही, प्रोजेक्ट, याची फी, त्याची फी म्हणत पैसा मागवलेला असतो. तो पैसा जात मात्र असतो संभाजी बागेतल्या भेळवर आणि ङोड ब्रिजवरच्या खारमुरेवाल्याकडे, लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या कणसावर आणि ‘गर्लफ्रेंड’ला दिलेल्या भेटीवर. दुष्काळ असो वा नसो, यांच्या जीवनात मात्र सतत माय- बापाच्या घामावर उगवलेली ‘हिरवळ’ असते.
पण दुष्काळग्रस्त भागातून आलेली सगळीच सरसकट पोरं अशी नसतात. वर सांगितलेल्या दोन प्रकारात असणा:यांची संख्या बहुसंख्य आहे; पण त्यातही संवेदनशील विचाराने झपाटलेला, दुष्काळातून आलेला विद्यार्थीही आतडं चिरत असताना तग धरून राहतोच की!  पुण्याची भाषा, संस्कृती, सुशिक्षितपणाच्या तथाकथित व्याख्या फाटय़ावर मारत जगणारी ही पोरं दुष्काळासंबंधीच्या संवेदनशील आणि असंवेदनशील भावनांच्या मधली पुसट रेषा ओळखण्याची हिंमत ठेवून असतात.
एफ.सी. रोडवरच्या रानडे इन्स्टिटय़ूट कॅण्टीनसारखे, मराठवाडय़ातील मुलांच्या कट्टय़ांसारखे कट्टे इतरही अनेक ठिकाणी आहेत. मराठवाडा आणि विदर्भात जिथं आमच्या वृत्तपत्रची पानं दुष्काळ आणि आत्महत्त्यांच्या घटनांनी रंगलेली असतात, तिथं पुण्यात मात्र या दुष्काळाच्या बातम्यांचाच दुष्काळ असतो. जिथं जगतो त्या जगात गावाकडच्या दुष्काळाच्या खाणाखूणाही नसतात. मग असे कट्टे आपल्या दुष्काळग्रस्त या ओळखीची आठवण करायला उपयोगी ठरतात. आणि अशाच कट्टय़ांवर पुण्यातील दुष्काळावर अभ्यास करणारी विचारी मित्रमंडळी भेटतात. पुण्यातल्याही ज्या माणसांना गावाकडचं जग, त्यातले प्रश्न कळतात तीही मग कळकळीनं या कट्टय़ांवर भेटतात.
- हे सगळं चालू असताना पाहता पाहता सेमिस्टर संपायला येतं आणि प्रेङोंटेशनचे दिवस येतात. कला विभागाच्या विद्याथ्र्यासाठी दरवर्षी ठरलेला हमखास विषय यावर्षीही असतो- दुष्काळ. मग कधी शेतातलं कसपटही न उचललेल्या पॉवर पॉईंट प्रेङोंटेशन संप्रदायातील मित्रमैत्रिणी गुगलवरून डाऊनलोड मारलेले दुष्काळाचे फोटो त्यांचं पीपीटी रंगवतात. दुष्काळ म्हटलं की पीक कोणतं घ्यायचं याची स्लाईड आलीच आणि मग सल्लाही. पाण्याचे योग्य नियोजन राखण्यासाठी उसासारखी पिके घेऊ नयेत वगैरे बाताही केल्या जातात. दुष्काळातून आलेल्या पोराच्या डोक्यात मात्र भूतकाळातील आठवणी, वर्तमानातील जगणं आणि भविष्याची चिंता यांचा धिंगाणा चालू झालेला असतो.
 वाटतं, आपण लहानपणापासून जगत आलोय हा दुष्काळ. हाफशावरच्या रांगा काही आजवर कधी संपल्या नाहीत, की घरातली चणचण कधी आटली नाही.  पाणी यायच्या दिवशी लग्नाची तारीखही कोणी काढत नाही आपल्या भागात! पाणी आलं की हावरटासारखं वाटीपासून सगळी भांडी भरणा:या गावातले आपण! आणि आपल्याला सांगतात हे, संडासच्या फ्लशने एक काकरी भिजेल येवढं पाणी वाया घालवणारी ही शहरी माणसं आपल्याला सांगतात कोणतं पीक घ्यायचं! हे ऐकलं की मग या पोरांच्या लक्षात येतं की, बाप्पा दुष्काळाच्या समस्यांवर उपाय सांगणारी अशी मंडळी असल्यावर दुष्काळ काय संपणार आपल्या नशिबीचा? सणक जातेच डोक्यात.
शेतावर, घरावर आणि जगण्यावर असलेलं दुष्काळाचं सावट  आपल्या करिअरवर पडू नये असा घोर जिवाला असतोच. एफ.सी. रोडच्या दुकानातील विंडो शॉपिंग करत, महागाचं जेवण टाळत रसिक मेसच्या 8क् रुपयांत तीन जण जेवत आणि उसाच्या बिलाच्या भरवशावर कॅण्टीनमध्ये उधारी करत खंबीरपणो ‘दुष्काळग्रस्त’ या टोमण्याला उत्तर देत, विद्यापीठातील ढेकणांना कुशीत घेत आम्ही दिवस काढत राहतो.
वाटतं कधीकधी, जे आहे ते आहे. दुष्काळ आणि त्यांचे चटके माहितीच नसणा:या या शहरी माणसांना सांगावंच एकदा की, येस, आय अॅम फ्रॉम लॅण्ड ऑफ काटय़ाकुटय़ा अॅण्ड दुष्काळ!
आहे काही हरकत तुमची?

लेखकाचा मूळ प्रकाशित सदर लेख वाचण्यासाठी खालील लिंक पाहू शकता
http://m.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=2146

लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/